मुंबई | विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. कोरोनाच्या वाढत्या नव्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता, हे अधिवेशन फक्त दोन दिवस घेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.
आज आणि उद्या (5 आणि 6 जुलै) होणारे हे अधिवेशन मुंबईत पार पडणार आहे. विरोधीपक्षाने थेट आक्रमक भूमिका घेतल्याने, हे अधिवेशन मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनाप्रमाणे अधिक गाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या अधिवेशनात सरकारकडून मुख्य 3 प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
• गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. हा कायदा रद्द करण्यासाठी शेतकरी दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात प्रस्ताव सादर केला जाण्याची शक्यता आहे.
• मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यभर पेटताना दिसत आहे. मराठा आरक्षणाची मागणी राज्यभर जोर धरत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, यासाठी एक ठराव मांडला जाणार आहे. केंद्र सरकारच्या हातात आरक्षणाचा चेंडू गेल्याने भाजप या विषयावर कोणती भुमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
• ओबीसी आरक्षणासाठी गरजेचा असलेला इम्पेरिकल डाटा केंद्र सरकारने द्यावा, अशी मागणी ठाकरे सरकार करत आहे. त्यामुळे आता या संदर्भात अधिवेशनात प्रस्ताव मांडला जाण्याची शकता आहे.
हे अधिवेशन फक्त 2 दिवसांचे असल्याने, या अधिवेशनात काय होणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे चर्चा होणार की नाही, अशी चिंता देखील व्यक्त केली जात आहे.
0 Comments