मुंबई | हवामान खात्याकडून कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
त्याचबरोबर पावसाचा तुफान मारा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. आज 15 जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. तर किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील.
त्याचबरोबर 16 जुलै रोजी देखील कोकण, गोवा या ठिकाणी अतिवृष्टी होईल. तर काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
आता 24 तासांऐवजी 15 मिनिटांच्या अंतराने हवामान अंदाज वर्तवण्याचा विचार सुरू आहे, असं केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी सांगितले आहे. एका ऑनलाइन कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रादरम्यान ते बोलत होते.
0 Comments