धाड - येथील बसस्थानकाच्या विकासासाठी शासनाकडून लाखो-कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, कामाचे कंत्राटही देण्यात आले. मात्र कामाचा ठरलेला कालावधी संपूनही बसस्थानकाचे काम अद्याप अपूर्णच आहे. परिणामी दररोज हजारो प्रवाशांना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. काम पूर्ण होणार तरी कधी, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
धाड हे परिसरातील महत्त्वाचे गाव असून येथे दररोज शेकडो बसेसची ये-जा असते. मेहकर, बुलढाणा, अकोला, जालना, छत्रपती संभाजीनगर यांसह अनेक ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी हे बसस्थानक महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र आज या बसस्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. काम रखडल्यामुळे सर्वत्र माती, खडी, धूळ आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.
पावसाळ्यात चिखल आणि पाण्याचे डबके निर्माण होत असल्याने प्रवाशांना उभे राहणेही कठीण झाले आहे. उन्हाळ्यात धुळीचे लोट उडतात, तर पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागते. बसमध्ये चढताना आणि उतरताना महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, बसण्याची योग्य व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छ परिसर अशा मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. महिलांना उघड्यावर किंवा गैरसोयीच्या ठिकाणी थांबावे लागत असल्याने त्यांच्या सन्मानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थिनी आणि महिला प्रवाशांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
बसस्थानक परिसरात स्वच्छतेचा पूर्ण अभाव असून सर्वत्र कचरा, प्लास्टिक, घाण आणि दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या स्वच्छता अभियानाला या बसस्थानकात अक्षरशः हरताळ फासला जात असल्याचे चित्र दिसत आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, कामाचे कंत्राट दिल्यानंतर संबंधित यंत्रणांनी कामावर कोणतेही प्रभावी नियंत्रण ठेवले नाही. कामाची गुणवत्ता, गती आणि मुदतीचे पालन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे काम रखडले असून प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे.
बसस्थानकाच्या विकासासाठी मोठा निधी खर्च होत असताना प्रत्यक्षात प्रवाशांना कोणतीही सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. "करोडो रुपये खर्च करूनही जर प्रवाशांना साध्या सुविधा मिळत नसतील, तर या विकासकामाचा उपयोग तरी काय?" असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
धाड परिसरातील व्यापाऱ्यांनाही या रखडलेल्या कामाचा फटका बसत आहे. बसस्थानक परिसरातील व्यवसायावर परिणाम झाला असून धूळ, चिखल आणि अस्वच्छतेमुळे ग्राहकांची संख्याही कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, संबंधित विभागातील अधिकारी आणि कंत्राटदार यांनी बसस्थानकाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करावे, परिसर स्वच्छ ठेवावा, महिलांसाठी आणि प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच शासनाने या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून विलंबास जबाबदार असलेल्या संबंधितांवर कारवाई करावी, अशीही मागणी पुढे येत आहे.
धाड बसस्थानकाचा प्रश्न हा केवळ एका इमारतीचा नाही, तर हजारो प्रवाशांच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि दैनंदिन सोयी-सुविधांचा आहे. विकासकामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होणे हीच जनतेची अपेक्षा आहे. मात्र धाड बसस्थानकाच्या बाबतीत ही अपेक्षा अद्याप पूर्ण झालेली नाही.
आता तरी प्रशासन जागे होणार का? रखडलेल्या कामाला गती मिळणार का? महिलांना, विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य प्रवाशांना मूलभूत सुविधा कधी मिळणार? धाड बसस्थानकाच्या कामाचा मुहूर्त अखेर कधी निघणार? हा प्रश्न आज संपूर्ण परिसरातील नागरिक विचारत आहेत. शासन, संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन काम पूर्ण करावे, अशीच जनतेची तीव्र अपेक्षा आहे.





0 Comments