नागपूर | कोरोनाच्या प्रकोपाने गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेचा मार्ग लवकरच सुरू होणार आहे. त्यासोबतच पदोन्नतीचा मार्ग देखील मोकळा होणार आहे. पोलीस भरतीबाबत आम्ही काम करत आहोत, असं मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
ठाकरे सरकारने पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला सध्या स्थगिती दिली आहे. याबाबत माध्यमांशी बोलतांना दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस भरतीबाबतही भाष्य केलं. यावेळी त्यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान, मराठा आरक्षण आदी विषयांवर देखील प्रतिक्रिया दिली.
तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्र -कोकणासह, गुजरातलाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी गुजरातला 1 हजार कोटीच्या मदत जाहीर केली आहे. पण महाराष्ट्रासाठी अद्याप मदत जाहीर केलेली नाही. केंद्राकडून गुजरातला मदत करणे अपेक्षित आहे, पण महाराष्ट्राकडे दुर्लक्ष व्हायला नको, असंही ते म्हणाले.
घाटकोपर परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोस्टर लावण्यात आले होते. याबाबत सांगतांना ते म्हणाले, हा पोलीस आयुक्तांच्या पातळीवरचा विषय, त्याबाबत मी वाच्यता करणे योग्य नाही.
0 Comments