चिखली - मनोज जाधव - चिखली ते मेहकर रोडवरील खैरव फाट्यावर आज दि.४ जून रोजी दुपारी ट्रक, कार आणि मोटारसायकलचा तिहेरी असा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, मोटारसायकलचा अक्षरक्षः चुराडा होऊन, मोटारसायकवरील एक महिला, बालक आणि तिचा पती अशा तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास खैरव फाटा ते मुंगसरी फाट्यादरम्यान हा अपघात घडला. अपघातातील इतर जखमींना चिखली येथे हलविण्यात आले असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
सविस्तर असे, की चिखली ते मेहकर रोडवरील खैरव फाट्यावर आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मालवाहू ट्रक आणि डस्टर कार (क्र. एमएच ०४ जीइ ५५०८) आणि प्लॅटिना मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता, की मोटारसायकलचा अक्षरक्षः चुराडा होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा पडला. या अपघातात मोटरसायकलवरील बुलढाणा तालुक्यातील घाटनांद्रा येथील रहिवासी गणेश यादव गायकवाड (वय ४५) हे त्यांच्या पत्नी आणि मुलासह ठार झाले. पत्नी लक्ष्मी गणेश गायकवाड (वय ४०), मुलगा कृष्णा गणेश गायकवाड (वय १५) अशी या दुर्देवी मृतांची नावे आहेत. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले गणेश गायकवाड हे गंभीर अवस्थेत होते, आणि त्यांना चिखली येथील डॉ. जवंजाळ हॉस्पिटलमध्ये नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच, चिखली पोलिसांनी अपघातस्थळी जाऊन मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयात पाठविले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या इतरांना तातडीने चिखली येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. वाहनाचा अतिवेग किंवा चुकीचा ओव्हरटेकमुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. किंवा, ट्रक आणि कारच्या चालकांच्या निष्काळजीमुळे तिघांचा हकनाक बळी गेल्याचा प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटल्या आहेत. या अपघातात पती, पत्नी आणि मुलाच्या मृत्यूने घाटनांद्रा गावावर शोककळा पसरली आहे.
0 Comments