बुलढाणा- जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कथा प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याबाबतची माहिती जमा करून ग्रंथरूपाने शब्दबद्ध करण्याचे काम जानेफळ येथील प्राध्यापक डॉ. शिवाजी म्हस्के यांनी केले आहे. पुणे येथील मिहाना पब्लिकेशनचे ऋतूपर्ण कुलकर्णी यांनी या ग्रंथाचे प्रकाशन केले असून हा ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचे फार मोठे योगदान असून यामध्ये अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन शौर्य गाजवले आहे. मात्र त्यांच्या पराक्रमाची ही गाथा इतिहासात दुर्लक्षित राहिली. हा दुर्लक्षित इतिहास जगासमोर व समाजासमोर आणण्यासाठीचा हा प्रयत्न डॉ. शिवाजी म्हस्के यांनी केला आहे. थोरामोठ्यांचा इतिहास हा सर्वांना सांगितल्या जातो व त्यांचे पुतळे बसविले जातात आणि त्यांचे स्तंभ उभारले जातात तसेच थोरामोठ्यांची जयंती व पुण्यतिथी देखिल साजरी केली जाते ती केली जावी मात्र सामान्य व अज्ञात स्वातंत्र्यवीर व क्रांतिकारक यांना आपण विसरून जातो. अशा ह्या अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या कथा या ग्रंथाच्या माध्यमातून समाजासमोर आणण्यांचा प्रयत्न केला गेला आहे. या ग्रंथामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा, मेहकर, डोणगाव, लोणार,देऊळगाव मही, रोहिणखेड, पाडळी, धामणगाव धाड, देऊळगाव साखरशा, मलकापूर, चांदूरबिस्वा, पातुर्डा, जानेफळ, पिंपळगाव राजा, खामगाव, माटरगाव, जळगाव जामोद, जांभोरा, चिखली इत्यादी ठिकाणच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला गेला आहे. त्यांना महाराष्ट्र सरकारकडून मिळालेले स्वातंत्र्य सैनिक प्रमाणपत्रे, भारत सरकारकडून मिळालेला ताम्रपट, स्वातंत्र्यसैनिक ओळखपत्र, कारागृहात तुरुंगवास भोगल्याचे प्रमाणपत्र त्यांच्या नातेवाईकांकडून प्राप्त करून त्यांचा जीवनपट मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या ग्रंथामध्ये चंद्रशेखर आझाद, भगतसिंग राजगुरू व सुखदेव तसेच रामप्रसाद बिस्मिल, अश्फाक उल्ला खान यांच्यासारख्या क्रांतिकारकासोबत स्वातंत्र्यलढ्याचे काम केलेले चिखली येथील रामकृष्ण खत्री तसेच आझाद हिंद फौज मध्ये कार्य केलेले गुलाम रब्बानी खान, तसेच क्रांतिकार्याबरोबरच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे आनंद स्वामी, पंढरीनाथ पाटील, दादासाहेब सोमन व इतर स्वातंत्र्यसैनिकांच्या कथा शब्दबद्ध केल्या आहेत. या ग्रंथामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये शहीद झालेल्या तीन हुतात्मांचा देखील इतिहास मांडला गेला आहे. बुलढाणा येथील सिद्धेश्वर गोरे, मलकापूर येथील पुंडलिक मराठा व चांदूरबिस्वा येथील वीर जगदेवराव पाटील यांच्या बलिदानाचा इतिहास लिहिला गेला आहे. अनेक ज्ञात व अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग व समर्पणातून आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. हा बलिदानाचा व त्यागाचा इतिहास विस्मरणात जाऊ नये यासाठी हा प्रयत्न केला गेला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन विधानपरिषद सदस्य अमोलभाऊ मिटकरी यांच्या हस्ते 12 जून 2025 रोजी करण्यात आले.
0 Comments