चिखली – मनोज जाधव - "स्थानिक भाजप नेते तिरंगा रॅली काढतात, मोठमोठे बॅनर लावतात, सेल्फी घेतात… पण जरा विचार करा – त्या तिरंग्याखाली दररोज शेतकऱ्यांचे मृतदेह लपेटले जातायत, त्याचं काय? हे देशप्रेम आहे का ढोंग?" – अशा थेट आणि संतप्त शब्दांत युवा नेते मनोज लाहुडकर यांनी भाजपवर घणाघात केला.
ते म्हणाले, "तिरंगा रॅलीत हसणारे चेहरे, ढोलताशे, झेंडे… पण त्याच गावात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, त्याच्या घरात ना ध्वज आला ना मदत. हीच का 'सबका साथ'? की निवडणूक जवळ आली की 'तिरंगा' आठवतो आणि शेतकरी मेल्यावर विसरला जातो?"
लाहुडकर यांनी स्थानिक आमदारांवरही जोरदार टीका केली – "गेल्या पाच वर्षात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, याचा आकडा माहित आहे का या लोकप्रतिनिधींना? की फक्त मंत्रालयात फोटो लावणं हेच त्यांचं उद्दिष्ट आहे?"
ते पुढे म्हणाले, "आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवू नका. हा देश शेतकऱ्याच्या घामावर उभा आहे. तिरंगा रॅली काढायचीच असेल, तर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरांपासून ती चालू करा – मग कळेल तुमचं खोटं देशप्रेम किती खोल आहे!"
शेवटी त्यांनी इशारा दिला, "जर शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल, तर आम्हीही रॅली काढू – पण ती तिरंग्याची नव्हे, तर संघर्षाची असेल. भाजपला गावागावात उत्तर द्यावं लागेल!"
0 Comments