चिखली- मनोज जाधव= चिखली परिसरात सध्या रासायनिक प्रक्रिया करून कृत्रिमरीत्या पिकवले जाणारे आंबे तसेच विविध प्रकारचे बनावट खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणावर विक्रीस येत आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून या प्रकारांना रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते तथा बुलढाणा जिल्हा केमिस्ट संघटनेचे जॉइंट सेक्रेटरी प्रशांत ढोरे पाटील यांनी केली आहे.
ढोरे पाटील म्हणाले की, “केवळ नफा कमावण्यासाठी व्यापाऱ्यांकडून कार्बाईडसारख्या घातक रसायनांचा वापर करून आंबे पिकवले जात आहेत. यामुळे नागरिकांमध्ये कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतोय. तसेच चॉकलेट्स, मिठाया, बर्फाच्या गोळ्या, शीतपेये, दुग्धजण्य पदार्थ यासारख्या खाद्यपदार्थांत बनावट व आरोग्यास घातक घटक मिसळले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.”
त्यांनी पुढे सांगितले की, “हे प्रकार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने, महसूल विभागाने आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करावी. बाजारपेठांमध्ये, फळ विक्री केंद्रांवर व शाळांजवळील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर नियमित तपासण्या व्हाव्यात.”
प्रशांत ढोरे पाटील यांनी यासोबतच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावरही भर दिला. “आई-वडील, शिक्षक व समाजातील जाणते नागरिकांनी मुलांना अशा अपायकारक पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी माहिती द्यावी. शाळांमधून, ग्रामसभा आणि स्थानिक मंडळांच्या माध्यमातून विशेष जनजागृती मोहीम राबवली पाहिजे,” असे ते म्हणाले.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.
0 Comments