Ticker

6/recent/ticker-posts

चोरीच्या भितीपोटी घातल्या लेकरांच्या पायात बेड्या



लखनऊ | लहान मुलांना चोरून नेण्याच्या घटना या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. अशातच उत्तर प्रदेशमधील अलिगड येथे देखील लहान मुलांच्या चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने, येथील परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


याच भितीतून एका पालकांनी आपल्या लहान मुलाच्या पायाला साखळी बांधून कुलूप लावल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरात चांगलाच गोंधळ उडाला आहे.


माहुआ खेडा येथील सरोज नगरात हातावर पोट घेऊन जगणारे काही कुटूंब रस्त्यावर झोपडी बांधून राहत आहेत. ही कुटुंबे गरिबीमुळे रस्त्याच्या कडेला राहून आपला उदरनिर्वाह करतात. आणि आपल्या मुलांना देखील पर्याय नसल्याने सोबत ठेवतात. 


एका अज्ञात व्यक्तीने येथील गरिब कुटूंबाचा फायदा घेत, 22 जून रोजी एका 2 वर्षाच्या मुलीला ती खाटेवर झोपली असतांना पहाटे 4 वाजता झोपडपट्टीतून उचलून नेले होते.


झोपेतून जाग येताच कुटूंबीयांना मुलगी तिथे नसल्याचे आढळून आले. कुटुंबीयांनी तीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, जेव्हा मुलीचा काहीच पत्ता लागला नाही, तेव्हा घरातील सदस्यांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली. गुन्हा नोंदवूनही पोलिस हरवलेल्या 2 वर्षाच्या मुलीचा शोध घेऊ शकले नाहीत.


लहान मुलांच्या चोरीच्या घटना वाढू लागल्याने, आजूबाजूच्या पालकांना देखील आपल्या मुलांची काळजी वाटू लागली. यामुळे त्यांनी आपल्या मुलांना लोखंडी साखळ्यांनी बांधून कुलूप लावले आहे. जेणेकरून कोणीही त्यांच्या मुलांना उचलून नेऊ शकणार नाही.

Post a Comment

0 Comments